नाशिक: यंदाचा मान्सून केरळच्या किनाऱ्यापासून अवघ्या ३० ते ३५ किलोमीटर अंतरावर येऊनही जवळपास गेल्या आठवड्याभरापासून पुढे सरकलेला नाही. हवामान विभागाने १५ मे रोजी दिलेल्या अंदाजानुसार २६ मे पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होणे अपेक्षित होते. मात्र मे अखेर येऊन ठेपली तरी मान्सून अजूनही रेंगाळलेलाच आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील दोन ते तीन दिवसांतही त्याच्या वेगात फारसा बदल होण्याची शक्यता नाही. त्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे.
उष्णतेने होरपळणारा महाराष्ट्र
मान्सूनचा विलंब आणि दुसरीकडे वाढणारी उष्णता यामुळे राज्यातील परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे. गुरुवारी वर्धा येथे ४६.८, नागपूर ४६.४, गोंदिया ४६.१, चंद्रपूर ४५.४, अमरावती ४५.२, जळगाव आणि परभणी ४२.४, बीड ४१.८, छत्रपती संभाजीनगर ४१.४, सोलापूर ४१.२, अहिल्यानगर ४१ असे ४० अंशांच्या वर तापमानाची नोंद झाली. तर पुणे ३८.४ आणि नाशिक ३७ अंशांवर राहिले. अमरावतीत काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या असल्या तरी राज्यातील बहुतांश भाग अजूनही उष्णतेच्या विळख्यात आहे.
संपत चाललाय जमिनीतील ओलावा
मागील काळात महाराष्ट्रभर तापमान सतत ४५ अंशांच्या पुढे राहिल्याने जमिनीतील नैसर्गिक ओलावा झपाट्याने कमी होत आहे. खरीप हंगामासाठी शेतकरी शेत तयार करून पावसाची वाट पाहत असताना, उष्णतेमुळे जमीन मात्र अधिक कोरडी पडत चालली आहे. अशा परिस्थितीत पाऊस उशिरा झाल्यास पेरणीसाठी आवश्यक ओल तयार होण्यास विलंब होतो. त्यामुळे पेरण्या लांबण्याची शक्यता वाढते.
विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीवर याचा मोठा परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कारण या भागांतील बहुतांश शेती थेट मान्सूनवर अवलंबून असते.
पेरण्या रखडल्यास उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता
सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि भात यांसारख्या खरीप पिकांसाठी जूनच्या सुरुवातीचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मात्र पावसाला उशीर झाल्यास शेतकऱ्यांना पेरणी पुढे ढकलावी लागू शकते. काही शेतकरी पहिल्या पावसावर पेरणी करतात, पण त्यानंतर पावसात खंड पडल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. त्यामुळे खर्च वाढेल आणि उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
देशात कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाने यंदाच्या मान्सूनबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार परिस्थिती चिंताजनक मानली जात आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात दीर्घकालीन सरासरीच्या केवळ ९० टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये ९२ टक्के पावसाचा अंदाज देण्यात आला होता. म्हणजेच मान्सूनबाबतची स्थिती आणखी कमकुवत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, देशभरात सरासरीपेक्षा कमी किंवा अत्यल्प पावसाची शक्यता तब्बल ८४ टक्के आहे. तर सरासरी पावसाची शक्यता केवळ १४ टक्के असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांत कमी पावसाचा अंदाज?
राज्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. पश्चिम विदर्भात पावसाची तूट गंभीर स्वरूपाची राहू शकते. मध्य महाराष्ट्रातील बहुतांश भागातही पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पश्चिम घाटालगतच्या काही भागांत तुलनेने समाधानकारक पाऊस होऊ शकतो, मात्र कोकणातही अतिवृष्टीचे स्पष्ट संकेत दिसत नाहीत.
एल निनोमुळे भीतीदायक परिस्थिती
हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार प्रशांत महासागरातील परिस्थिती सध्या हळूहळू एल निनोकडे सरकत आहे. जूनपर्यंत एल निनो सक्रिय होण्याची शक्यता ८२ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते, तर जुलै आणि ऑगस्टमध्ये ती ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
शेतीसोबत ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही फटका
पाऊस कमी राहिल्यास त्याचा परिणाम केवळ शेतीपुरता मर्यादित राहणार नाही. धरणांतील पाणीसाठा कमी होणे, विहिरींची पातळी घटणे, जनावरांसाठी चाऱ्याची टंचाई निर्माण होणे आणि ग्रामीण भागातील रोजगारावर परिणाम होणे, अशी अनेक संकटे उभी राहू शकतात. उत्पादन घटल्यास बाजारात अन्नधान्याच्या किमती वाढण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
आता शेतकऱ्यांची नजर फक्त आकाशाकडे
राज्यातील लाखो शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. वाढते तापमान आणि प्रत्येक पुढे ढकलला जाणारा पावसाचा अंदाज त्यांच्या चिंतेत भर घालत आहे. कारण मान्सूनवरच मुख्यत्वे महाराष्ट्रातील शेती अवलंबून आहे.