एटीएम न्यूज नेटवर्क ः शेतकऱ्यांना शेतमालाची थेट विक्री करण्याची परवानगी सरकारने यापूर्वीच दिली आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून पुष्कळ काम करण्याची गरज आहे. शेतीमालाची साठवणूक करण्याची आवश्यकता आहे. साठवणुकीची व्यवस्था नसताना शेतकऱ्यांना माल विकावा लागतो. शेतकरी स्वतः इतकी मोठी व्यवस्था निर्माण करू शकत नाही, हे एक मोठे आव्हान आहे. शेतकरी उत्पादक कंपन्या समोर येत असून, शेतमाल उत्पादनापासून ते विक्रीची एक साखळी निर्माण होत आहे. हा प्रयोग चांगला यशस्वी झाला, तर शेतकऱ्यांना संधी मिळणार आहे, असे प्रतिपादन महसूल तसेच पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
नाशिक येथे एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. श्री. विखे पाटील म्हणाले, राज्यातील पणन व्यवस्था काळाच्या ओघात सक्षम होणे आवश्यक असून, कृषी आणि पणन विभागाची एकत्रित सांगड घालण्याची गरज आहे. दोन खाते दोन भिन्न व्यक्तींकडे असल्यामुळे त्यांच्यात ताळमेळ बसत नाही. कोविडनंतर शेतमालाच्या साठवणुकीपासून ते कापणी पश्चात तंत्रज्ञान, शीतसाखळी बळकट करण्याकडे पणन विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे.
ते म्हणाले की, प्रत्येक जिल्ह्यात शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून विविध पिके घेणारे शेतकरी एकत्र येत आहेत. आपला माल वेगवेगळ्या बाजारपेठेत विक्री होईल याची व्यवस्था करू लागले आहेत. त्यामुळे आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांची मक्तेदारी संपली आहे. शेतकरी उत्पादकही झाला आणि आपल्या मालाची विक्रीही करू लागला आहे.
विखे पाटील म्हणाले, शेतकऱ्यांनी रासायनिक खते, औषधांचा आणि कीटकनाशकांचा वापर हद्दपार केला करावा. जनावरांना दिल्या जाणाऱ्या चाऱ्यावर रासायनिक कीटकनाशके आणि औषधे फवारलेली असतात. त्याचा नकारात्मक परिणाम जनावरांच्या दुधावर होतो. शेतकऱ्यांनी जैविक खतांचा, जैविक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्याची गरज आहे.
इथेनॉलच्या निर्मितीसाठी लागणारा निधी उभारण्यासाठी सरकार धोरणामध्ये बदल करणार असून, त्यासाठी काही निर्णय घेण्यात येणार आहेत. साखरेच्या या वर्षीच्या निर्यात धोरणामध्ये कोटा पद्धत अवलंबावी अशी मागणी केली जात आहे. साखर खुल्या बाजारात निर्यात करता यावी यासाठी कोटा पद्धतीचा फेरविचार करण्याची विनंती केंद्रीयमंत्र्यांनी मान्य केली आहे. तसेच साखर कारखानदारीसोबत प्राथमिक सोसायट्या अधिक सक्षम करण्यासाठी वीस प्रकारच्या विविध उपक्रमातून प्राथमिक सोसायट्या सक्षम करण्याचे धोरण लवकरच जाहीर करणार आहोत, अशी माहिती श्री. विखे पाटील यांनी दिली.